Tuesday 30 September 2014

पुण्यातील वाहतुकीची जटिल समस्या

पुण्यातील वाहतुकीची जटिल समस्या 




पुण्याच्या वाहतूक समस्येबद्दल विचार करतांना माझ्या मनांत जे विचार आले ते मी येथे माझ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करत आहे. 
पानशेतच्या जलप्रलयापूर्वी म्हणजेच १९६१ पूर्वी पुणे हे अत्यंत आटोपशीर असे एक शांत खेडेच होते असे म्हटले तर ते योग्य ठरेल.मला चांगलेच आठवते की, त्याकाळी पुण्याची ओळख पेन्शनरांचे शहर’, ’विद्येचे माहेरघरसायकलींचे शहरअशी केली जात असे. शहराचा पसारा फारसा वाढलेला नव्हता. रस्त्यावरील वाहतुकीत प्रामुख्याने पादचारी,टांगे व सायकलींचा भरणा होता. अतिशय तुरळक प्रमाणात स्वयंचलीत दुचाकी व चार चाकी मोटारी पुण्यात दिसत असत. वाहतुकीला शिस्त होती व वाहतूक नियंत्रण करणार्‍या पोलिसांचा दरारा होता.चौकाच्या मध्यभागी उभे राहून वाहतूक पोलिस हाताच्या इशार्यांवर वाहतुकीचे नियंत्रण करत असत.अत्यंत क्षुल्लक अशा छोट्या छोट्या चुकींनाही शिक्षा केली जात असे. सहसा कोणी वाहतुकीचे नियम उल्लंघन करायला धजावत नसे. जनतेवर कायदा व सुव्यवस्थेचा धाक होता राजरोसपणे मांडवली करून चिरीमिरी ना पोलिस सोडत नसत. १९६१ मध्ये झालेल्या पाशेत धरणफुटीनंतर मात्र दिवसेंदिवस पुणे चोहोबाजूंनी प्रचंड झपाट्याने अनियंत्रित,अनिर्बंध पद्धतीने विस्तारत गेले. मात्र विस्ताराबरोबरच सुविहित नियोजन व नियंत्रणाअभावी पायाभूत सुविधांमध्ये होणारी वाढ अत्यंत तोकडी असल्याने वाहतुकीच्या समस्या उद्भवत गेल्या. मात्र दुर्दैवाने या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचा साकल्याने अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी लागणारी प्रगल्भ राजकीय इच्छाशक्ती असणारे ,समस्येकडे द्रष्टेपणाने पाहून दूरदृष्टीने त्या सोडवणारे खंबीर स्थानिक नेतृत्व महानगपालिकेत नव्हते.जे स्थानिक राजकीय नेते व नगरसेवक होते ते संकुचित विचारांचे,कोत्या मनोवृत्तीचे ,सुस्त आणि भ्रष्ट.ते सदैव गर्क होते अंतर्गत गटबाजी, लाथाळया,अवैध मार्गांनी संपत्ति गोळा करण्यात मश्गुल. जनहिताकडे व शहराच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष करून स्वत:चे आर्थिक भले करून घ्यायच्या हव्यासापायी अशा नेत्यांनी पुण्याची साफ वाट लावून टाकली. पुणे हे अजगरासारखे अस्ताव्यस्त पसरलेले बकाल शहर झाले. सर्वत्र झोपडपट्टयांची बेसुमार वाढ झाली. फक्त रस्त्यांवर नव्हे तर बहुतांशी पादचारी मार्गांवरही पथारिवाल्यांनी व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली व कब्जा घेतला. स्थानिक नेत्यांनी अतिक्रमणांचा बीमोड करून समूळ नायनाट करण्याऐवजी एकगठ्ठा मतांसाठी त्यांना अभय व सरक्षण दिले.सर्वच क्षेत्रात भष्टाचार बोकाळला मग त्यात वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असणारे कर्मचारी तरी कसे मागे रहातील ? त्यांनीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांकडून लांच घेऊन सोडायला सुरुवात केली. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार समजला जाऊ लागला. कायद्याचे राज्य केंव्हाच लयाला गेले. एखाद्या अधिकार्‍याने जर ठामपणे व निग्रहाने नियमांनुसार कायद्याने वागायचा प्रयत्न केलाच तर असे भ्रष्ट व स्वार्थी नेते मोर्चे काढून त्या अधिकार्‍यालाच निलंबित करावे अशा मागण्या करू लागले. स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे त्या अधिकार्‍याला वरिष्ठांकडून कधी कधी अगदी मंत्र्यांकडूनही कृती करू नका असे फोन येऊ लागले ,त्यांनाही भीक न घालता एखाद्या अधिकार्‍याने जर नेटाने कायद्याचे पालन करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याचीच उचलबांगडी (बदली) एखाद्या दुर्गम ठिकाणी पाठवण्यात येत असे. या दुष्टचक्रामुळे समस्यांची उकल होण्याऐवजी दिवसेंदिवस त्या जास्तच जटिल,अक्रारविक्राळ व उग्र बनत गेल्या. आणि आत्ताचे चित्र पहाता नजीकच्या भविष्यकाळातही त्या सुटतील असे मानणे म्हणजे दिवास्वप्न पहाण्यासारखे होईलअसे मला तरी वाटते अशी आशा करणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनांत वावरणे होय. या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने एक सर्वंकष असा कायदा बनवला असून तो येत्या हिवाळी अधिवेशाणांत पारीत केला जाणार आहे असे समजले. पण आमचे अतिशय सुपीक डोक्याचे पुणेकरअशा कायद्यातील पळवाटा तो अंमलात येण्याचा आत शोधून काढतील व त्यामुळेच तो किती प्रभावीपणे राबवला जाईल याचीच शंका वाटते. त्याखेरीज आजकालचा भ्रष्टाचार पाहता सलमान खान सारखे धांदांडगे लोक हा कायदा धाब्यावर बसवून तो पायदळी तुडवणार नाहीत याची काय हमी ? हां, आता जर दुबई,मलेशिया,सिंगापूर व इतर तत्सम परदेशी शहरांच्या धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व महत्वाच्या रस्त्यांवर आणि चौकाचौकात सर्व्हिलंस कॅमेरे बसवून जर गुन्हेगाराचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई सुरू केली तर मात्र कदाचित हे चित्र बदलू शकेल असे वाटते. मात्र त्यासाठी काम करणारी यंत्रणा ही पुर्णपणे राजकीय हस्तक्षेप मुक्त व पुर्णपणे स्वायत्त असणे आत्यंतिक गरजेचे आहे असे मला वाटते. 


Thursday 11 September 2014

गणेश विसर्जन - काही विचार

गणेश विसर्जन - काही मूलभूत विचार 



 गणेश विसर्जन म्हटलं की सर्व अभक्त एकमुखाने कंठशोष करत असतात...गणपति बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या ! 
पण विसर्जन केले आणी संपला! इतका आमचा बाप्पा हलका नाही! 
या पार्थिमूर्तीपूजन व विसर्जनाबाबत समर्थ रामदासांनी दासबोधात काय लिहून ठेवले आहे ते विचार करण्यासारखे आहे.
समर्थ म्हणातात, की मातीच्या (शाडूच्या)  मूर्तीची आधी दहा दिवस पूजा करायची व  मग सर्वच विसर्जन करावयाचे  हे अंतःकरणाला पटत नाही.
मृतिकापूजन करावें | आणी सवेंचि
विसर्जावें | हें मानेना स्वभावें | अंतःकर्णासी ||||
देव पूजावा आणी टाकावा | हें प्रशस्त न वटे
जीवा | याचा विचार पाहावा | अंतर्यामीं ||||
देव करिजे ऐसा नाहीं | देव टाकिजे ऐसा नाहीं |
म्हणोनि याचा कांहीं | विचार पाहावा ||||
देव नाना शरीरें धरितो | धरुनी मागुती सोडितो |
तरी तो देव कैसा आहे तो | विवेकें वोळखावा ||||
नाना साधनें निरूपणें | देव शोधायाकारणें |
सकळ आपुले अंतःकर्णें | समजलें पाहिजे ||||
इथे विवेकानेच काम करायचे आहे. भोळा भाव इथे काहीच कामाचा नाही. कारण भोळ्या भावाठायी आज्ञानच उपजण्याची शक्यता जास्त शक्यता ! आणि अज्ञानाने देव कधीच भेटत नाही.  
आपल्याला हे कळायला हवे की अरे मूढा हा देव आपण घडवू शकू असाही नाही आणि नष्ट करू शकू असेही त्याचे अस्तित्त्व नाही. तो आहेच ! अगदी सर्वत्र आहे. स्व-इच्छेने तो अनेक शरीरे धारणही करू शकतो व त्या देहांचा त्याघी करू शकतो त्यामुळे हा देव नक्की आहे तरी कसा ? हे कळावे म्हणून हा उपद्व्याप आहे. आधी त्याला आवाहन करताच तो मूर्तीत वास करून त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो आणि विसर्जन होऊनही सर्वत्र शिल्लक रहातो , अनुभव देतो तोच खरादेव आहे  व आम्हाला  तोच विवेकाने जाणून घ्यायचा आहे.
म्हणोनि जितुका भोळा भाव | तितुका अज्ञानाचा
स्वभाव | अज्ञानें तरी देवाधिदेव | पाविजेल कैचा ||११||


Monday 8 September 2014

आठवणींच्या गंधकोषी - माझे पूज्य गुरुजन - नन्ना भिडे सर

आठवणींच्या गंधकोषी - माझे पूज्य गुरुजन - नन्ना भिडे सर 

न.ना.भिडे : शाळेत इयत्ता ९ वी मध्ये आम्हाला संस्कृत विषय शिकवण्यासाठी नागपूरचे एक नवीन शिक्षक शाळेत आले होते,त्यांचे नांव होते.नरहरी.नारायण.भिडे.तथा नन्ना भिडे. अत्यंत बुद्धिमान,वयाने ५० चे पुढे,ऊची ५’-”,अत्यंत बोलके व भावुक असे डोळे,तेजस्वी व हसरा चेहरा,गुलाबी गौर वर्ण,असे त्यांचे वर्णन करता येईल.स्वच्छ पांढरे शुभ्र दुटांगी धोतर, सूती पांढराच शर्ट, त्यावर क्रीम कलरचा कोट, भव्य कपाळावर केशरी गंध,डोक्यावर काळी टोपी,पायात चामड्याचा कोल्हापुरी वहाणा असा त्यांचा वेष असे.ते संघाचे निस्सीम कार्यकर्ते होते.सरसंघचालक मा.मा.स. गोळवलकर गुरुजींचे ते निकटवर्ती होते. आजही संघाचे प्रत्येक शाखेत / सराव शिबिरांत सुरूवातीस ध्वजासमोर उभे राहून ध्वजाला नमन करून जी संस्कृत प्रार्थना म्हटली जाते ती प्रार्थना त्यांनी प्रथम १९३७ मध्ये संस्कृतमध्ये लिहिली आहे हे फार थोड्या लोकांना माहिती असेल.  
वर्गात अतिशय तन्मयतेने,साध्या,सोप्या भाषेत सर्वांना कळेल अशा पद्धतीने विषय शिकवण्याची त्यांची हातोटी खरोखरच वाखाणण्यासारखीच होती,त्यामुळेच अल्पावधीतच ते विद्यार्थ्यांत खूपच आवडते शिक्षक झाले. केवळ संस्कृत नव्हे तर संस्कृत खेरीज इतर अनेक विषयांवरही त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे जे बौद्धिक प्रबोधन केले त्यास तोड नाही.खास करून रामायण,महाभारत अशा पौराणिक,अध्यात्म,तत्वज्ञान असे विषय किंवा परंपरा व सामाजिक रूढी अगर देव/ ईश्वर ह्या संकपल्पनेवर त्यांनी आम्हाला जे मूलगामी ज्ञान दिले त्याचा त्यावेळी आमच्या मनावर खोलवर जो ठसा ऊमटला तो आजही पुसला गेलेला नाही.

११ वीत अशोक परांजपे, अनिल खारकर व आनंद म्हसकर स्पेशल संस्कृत शिकायला श्री भिडे       गुरुजींकडे जात असत. त्यांचेपैकी आनंद म्हसकरला जगन्नाथ शंकरशेत शिष्यवृत्ती मिळाली होती. 

“स्व”आनंदासाठी आत्मनिर्भर व्हा !

“स्व”आनंदासाठी आत्मनिर्भर व्हा !

आयुष्यांत इतर कोणत्याही गोष्टींसाठी एक वेळ तुम्ही इतरांवर अवलंबून राहिलात,तडजोड केलीत तरी चालेल ,पण  आनंदासाठी नाही. कारण “तुमचा आनंद हा फक्त आणि फक्त तुमचाच असतो हे कायम लक्षांत असूं द्या व त्यासाठी कधीही इतरावर अवलंबून रहात जाऊ नका. ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद लाभेल त्या गोष्टीने तो तसाच इतरांनाही लाभेलच अशी खात्री नाही देता येत , म्हणूनच जे केल्याने तुमच्या मनाला आनंद वाटेल ते करण्यासाठी मागचा-पुढचा कसलाही विचार करत बसूं नका. मुक्तपणे आनंद लुटा.  तुम्हाला ज्या गोष्टींत रस असेल रुचि-आवड असेल, जो काही छंद-विरंगुळा असेल,मन आनंदी होत असेल मग इतरांच्या दृष्टीने कदाचित तो वेडेपनाही असेल तरीही  त्यांत सर्वस्व झोकून देऊन वैयक्तिक पातळीवर ती गोष्ट/आवड/छंद  पुर्ण करण्याचा सदैव आटोकाट प्रयत्न करत रहा. इतरांना काय वाटेल ? याचा विचार करत बसून कच खाऊ नका तर स्वत:चे मन काय कौल देते त्याला जास्त महत्व देत जा. म्हणतात ना ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हेच सत्य आहे. या बाबतीत स्वा. सावरकर म्हणतात त्याप्रमाणे “ सहभागी झालात तर तुमच्यासह पण नाही झालात तर तुमच्या शिवाय आणि जरी विरोध केलात तरी त्याला न जुमानता “ मी माझा आनंद मिळवणारच ! अशा वृत्तीने  वागत जा व लोकमान्य टिळकांप्रमाणे  “आनंद मिळवणे हा माझाजन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच” असे खंबीरपणे म्हणून कृती करा. आनंदाच्या प्राप्तीसाठी कदापिही  इतरांवर अवलबून न रहाता स्वयंनिर्भर व्हा , स्वमग्न रहा.तुमचा स्वभाव जर भिडस्त असेल तर कदाचित सुरवातीला हे जरा कठीण वाटेलही पण दृढपणे , कटाक्षपूर्वक वागून व अथक प्रयत्न करून हे एकदा साध्य करून घ्याच आणि मग पहा कसे वाटते ते !    
वाचा आणि विचार , कृती व आचरण करा.